Archive

Archive for August 13, 2010

चिमणी गाते कारण…

चिमणी गाते कारण…

चिमणी गाते कारण
तिच्यात गाणं असतं
तिचं गाणं गाण्यातच
तिचं जगणं असतं

मोराचं अंग नाही
त्याच्या पिसांचा रंग नाही
कोकीळेचं गाणं जसं गोड
तसा या गाण्याचा ढंग नाही

चिमणी गाते कारण
तिच्यात देवाचं गाणं असतं
पिसांचा पसारा आणि कोकीलेचा गोडवा
नसला, तरी काहीतरी सांगणं असतं

सूर्यावर प्रेम नाही
तिचा तारकांवर राग नाही
महिन्यातून दोन वेळा पूर्ण होणाऱ्या
चंद्रासारखा तिच्यात डाग नाही

चिमणी गाते कारण
ते तिचं गाणं असतं
ते गाणं जगाला देण्यात
तिचं जगणं असतं

कोणी ऐकायला नाही
आणि बघायला नाही
कोणी स्तुतितर नाहीच
पण टिका करायलाही नाही

चिमणी गाते कारण
ते तिच्या मनाचं गाणं असतं
ते रोज मनाने गाऊन
तिचं देवा जवळ जाणं असतं

चिमणी गाते कारण
ते गाणं फक्त गाणं नसतं
जिवनाला सर्वस्व देऊन
त्यातून आनंद घेणं असतं

— मयुरेश कुलकर्णी

कविता जमली पाहिजे

August 13, 2010 6 comments

कविता जमली पाहिजे

कविता बर्फाच्या गोळ्यासारखी जमली पाहिजे
मधाच्या नादात, माशीसारखी रमली पाहिजे

तिला कवितेवर फारच राग, म्हणे
“कविता मी आल्यावर थांबली पाहिजे”

कविता अशी देवाच्या स्वर्गात सुरू, आणि
तिच्या कपाळावरच्या टिकलीवर संपली पाहिजे

त्यांना कविता काय माहित जे म्हणतात
ती सुर-तालात नीट बसली पाहिजे

कविता माझ्यासारखी संतापून मग
तिच्यासारखी हळूच लाजली पाहिजे

मेंदू कडे विचारांचा धक्का पोचवून मग
कविता हृदयाला पण लागली पाहिजे

समाजावर रडली नाही तर निदान
कविता कविच्या लाचारीवर हसली पाहिजे

ती रुसली की, तिला मनवण्यासाठी
एखादीतरी कविता पटकन सुचली पाहिजे

— मयुरेश कुलकर्णी